मेट्रोसिटीच्या धर्तीवर कोल्हापूरचा विकास ही छत्रपती घराण्याची दूरदृष्टी
: संयोगिताराजे
संभाजीराजेंनी आणलेली 620 कोटींची घरगुती गॅस पाईप लाईन योजना लवकरच पूर्णत्त्वास
कोल्हापूर :
आधुनिक जगातील मेट्रो सिटीच्या धर्तीवर कोल्हापूर विकसित होण्याची दूरदृष्टी छत्रपती घराण्याने नेहमीच बाळगली आहे. म्हणूनच संभाजीराजे यांनी आपल्या खासदारकीच्या कारकिर्दीत मेट्रो सिटीच्या निकषापैकी एक असलेल्या स्वयंपाकाच्या गॅसचा थेट पाईप लाईनने पुरवठा ही तब्बल 620 कोटी रूपयांच्या खर्चाची योजना खेचून आणली. आज या योजनेचा निम्मा टप्पा पूर्ण झाला असून आगामी काही महिन्यांच्या काळात ही योजना पूर्णत्त्वास जाईल, असे प्रतिपादन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले. दरम्यान, उगाचच ऊर बडवून घेत अशा कामांचे श्रेय लाटण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून वा छत्रपती घराण्यातील सदस्य म्हणून कुणीही, कधीही केला नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या गॅस पाईप लाईन योजनेसाठी संभाजीराजे यांनी तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या योजनेमुळे शहरातील सर्व घरात थेट स्वयंपाक घरात घरगुती गॅस पोहोचणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. कामाचे श्रेय घेण्यापेक्षा जनतेला सुविधा लवकरात लवकर कशी प्राप्त होईल यावर राज परिवारातील प्रत्येक सदस्य पूर्वांपार भर देत आला आहे. छत्रपती घराण्याचा तो स्वभावच आहे. म्हणूनच संभाजीराजेंनी या गोष्टीचे कधीही भांडवल केले नाही, अशी माहिती युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रकाश पाटील, विनायक फाळके, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सौ. सरलाताई पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महेश बराले, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रवी चौगले यांच्या पुढाकाराने रूईकर कॉलनी परिसरात कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ मतदारांच्या गाठीभेटी आणि सुसंवाद मोहिमेद्वारे संयोगिताराजे छत्रपती यांनी आपली भूमिका पटवून देत मतदारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक प्रकाश पाटील म्हणाले, कोल्हापूरची अस्मिता असलेल्या निगर्वी आणि बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणार्या शाहू महाराजांना संसदेत पाठवण्याची जबाबदारी स्वीकारून पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्याची गरज आहे.
सद्यस्थिती पाहता यावर्षीची महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आम्हाला साजरी करता आली. पण केंद्रातील प्रतिगामी आणि मनुवादी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास पुढच्या वर्षी ही जयंती साजरी करण्याचीही संधी मिळणार नसल्याची भीती रेश्मा चांदणे यांनी व्यक्त केली.
यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सौ. सरलाताई पाटील म्हणाल्या, देशासमोर अराजकता आणि जातीयवादी प्रवृत्तींनी निर्माण केलेला धोका पाहता आता महिला वर्गाने पुढाकार घेऊन भाजपला हद्दपार करावे.
यावेळी माजी नगरसेवक तौफीक मुल्लाणी, उद्योजक संदीप मिरजे, डॉ. विजय मुळीक, अमरदीप पाटील, कृष्णन परमेश्वरण, प्रीतम पाटील, पृथ्वी पाटील, प्रसाद पाटील, कल्याणी पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सायली महाडिक, शोभा अरविंद, सविता तोरणे, नेत्राली देसाई, शोभा कृष्णन, राधिका देसाई, वैशाली पाटील, माधुरी चव्हाण, लक्ष्मी कृष्णन, जयश्री पाटील, राजश्री पोवार, इंदिरा चौगले, शोभा कृष्णन आदि मान्यवर उपस्थित होते.