शाहू छत्रपती दत्तक, खरे वारसदार जनता
शाहू महाराजांवरील मंडलिकांच्या विधानामुळे कोल्हापूरकर संतप्त
जोरदार निदर्शने, माफी मागा, जनतेची मागणी
कोल्हापूर
श्रीमंत शाहू महाराज हे दत्तक असून कोल्हापूरची जनताच खरे वारसदार आहेत असे वादग्रस्त विधान खासदार संजय मंडलिक यांनी केले. यामुळे कोल्हापुरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मंडलिकांनी आपले विधान मागे घेण्याबरोबरच जनतेची माफी मागावी अशी मागणी करत दसरा चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. राज्यभरातूनही मंडलिकांच्या या विधानाचा विविध नेत्यांनी निषेध केला आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या वतीने श्रीमंत शाहू महाराज तर महायुतीच्या वतीने खासदार संजय मंडलिक मैदानात उतरले आहेत. महायुतीच्या गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या एका प्रचार सभेत मंडलिक यांनी महाराजांवर टीका केली. ते म्हणाले, माझे वडिल सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपला. आखाड्यात उतरल्यानंतर विरोधी मल्लाला हातच लावायचा नाही, मग् त्या मल्लाला टांग कशी मारायची, कुस्ती कशी मारायची असा सवाल त्यांनी केला.
मंडलिकांच्या वादग्रस्त विधानानंतर कोल्हापुरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शाहू महाराजांचा अपमान सहन करणार नाही अशी भूमिका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी मांडली. सायंकाळी कोल्हापूरकर दसरा चौकात आले. त्यांनी मंडलिकांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. त्यांचा निषेध केला. मंडलिकांनी आपले विधान मागे घेऊन महाराजांची माफी मागावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
याबाबत बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचे शाहू महाराजांवरील वक्तव्य म्हणजे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा अपमान आहे, हा अपमान कोल्हापूरची जनता सहन करणार नाही, त्यांना निवडणुकीत नक्की उत्तर मिळेल अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली.
मंडलिकांच्या वादग्रस्त विधानानंतर प्रतिक्रिया देताना आमदार पाटील म्ह्णाले,संजय मंडलिक यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच त्यांच्याकडून अशी वक्तव्य होत आहेत. आपल्यावर एक लाखांचं लीड पडणार हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच त्यांच्याकडून अशी वक्तव्य होत आहेत.
मंडलिकांच्या या वक्तव्याचा प्रायश्चित्त कोल्हापूरची जनता त्यांना देईल मात्र त्याआधी त्यांनी माफी मागावी अशी मागणी करताना आमदार पाटील म्ह्णाले, आता बाजू सांभाळून घेण्यासाठी प्रवीण दरेकरांकडून जुन्या गोष्टी उकरून काढल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या वक्तव्याची दखल घेऊन याबाबत खुलासा करावा. वैयक्तिक टीकेची सुरुवात आम्ही केली नाही असे सांगून पाटील म्ह्णाले, या सगळ्याचा शेवट कोल्हापूरची जनता करेल.
*हा कोल्हापूरचा अपमान*
मंडलिकांच्या पायाखालची वाळू घसरल्याने तोल जाऊन ते विधान करत आहेत. त्यांना आता जनताच योग्य शब्दात उत्तर देईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली. ते कुस्ती हरायला लागले आहेत, आता माती टाकून उपयोग काय असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही निषेध करत गादीचा अपमान सहन करणार नाही असे स्पष्ट केले.